संपादकीय

प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज

दौंड (BS24NEWS संपादकीय) छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील आदर्श नेतृत्व आहे. त्यांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. लोकहित डोळ्यांसमोर ठेवून राज्यकारभार करण्याबरोबरच त्यांनी समता, बंधुता या मूल्यांची प्रतिष्ठापना केली. सर्व नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या स्वराज्यनिर्मितीबरोबरच त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य आज जगभर प्रेरणा ठरले आहे.

छत्रपती शिवरायांनी आपल्या कारभारातून समानतेचे तत्व जोपासले. त्यांनी सैन्याबरोबर राहून सर्व कसोटीच्या व संकटाच्या प्रसंगांना धैर्याने तोंड दिले. सर्व जातिधर्माच्या लोकांना कार्यात समाविष्ट करून घेतले. त्यांना सन्मान दिला. सर्वांना स्वराज्यात महत्त्वाचे स्थान दिले. सर्व विरोधी सत्तांना पाणी पाजणारे सैन्य छत्रपती शिवरायांनी निर्माण केले. कुठल्याही भेदभावाला स्थान दिले नाही. त्यामुळे शिवरायांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात मावळ्यांनी जगाच्या पाठीवरील अनेक बलाढ्य साम्राज्यसत्तांशी संघर्ष करून स्वराज्य अबाधित ठेवले. शिवरायांचे जीवनकार्य जगातील समस्त नेतृत्वासाठी प्रेरणा ठरत आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा हा परिवर्तनासाठी होता. रानावनात राहणाऱ्या, शेतात राबणाऱ्या गोरगरीबांसाठी होता. त्यांची ‘मुद्रा भद्राय राजते’ ची मुद्रा समस्त प्रजेला विश्वास व संरक्षण व हिताची ग्वाही देणारी होती. शिवरायांचे पिताजी शहाजीराजे महाराजसाहेबांनी छत्रपती शिवरायांना बालपणीच राजमुद्रा देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय दर्शवले होते.

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

अर्थात, प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तसा शहाजीराजेंचे पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल आणि अवघ्या विश्वासाठी ती कल्याणकारी राहील. मोठ्या दूरदृष्टीने ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजीराजेंचे लोकहिताचे विचार व ध्येय याद्वारे स्पष्ट होतात. हे स्वराज्य स्वत:साठी नसून, प्रजेच्या कल्याणासाठी आहे असा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला दिला. त्यामुळेच ही राजमुद्रा विश्ववंदनीय आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी स्थापन केलेल्या लोककल्याणकारी राज्याचे उदाहरण आजही आदर्श आहे. शिवरायांनी कृषी विकास, जलसिंचन, पर्यावरण संवर्धन, लोककल्याणकारी प्रशासन, उद्यमशीलता अशा विविध बाबतीत विकासाचा परिपूर्ण दृष्टिकोन निर्माण केला. शिवाजी महाराजांनी जलसंवर्धन, वनसंवर्धन, ग्रामस्वच्छता, लोकाभिमुख प्रशासन अशा विविध दृष्टिकोनातून एक खऱ्या अर्थाने आधुनिक राज्य स्थापन केले.

व्यापक लोकहित साधणारी सक्षम यंत्रणा शिवाजी महाराजांनी निर्माण केली. त्यांचे प्रशासकीय कौशल्य जगभरातील प्रशासकांसाठी प्रेरणादायी आहे. राज्यातील शेतकरी, गोरगरीब यांच्याबाबतची तळमळ त्यांच्या पत्रव्यवहार व वेळोवेळी जारी केलेल्या आदेशावरूनही दिसून येते. ‘रयतेला काडीचाही त्रास देण्याची गरज नाही. रयतेच्या दाणे, भाकर, गवत, फाटे, भाजीपाला यांना हातदेखील लावायचा नाही. प्रत्येकवेळी सर्वदूर फिरून लोकांशी संपर्क ठेवावा. शेतकरी बांधव, शेती व पशुधनाची काळजी घ्यावी,’ असे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले होते. शेतकरी बांधवांना बैलजोडी व बी-बियाणे यासाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. दुष्काळ निवारणासाठी त्यांनी पाणी साठवण योजना राबवली. प्रत्येक बाबतीतील सुस्पष्ट आदेश व त्यांच्या अंमलबजावणीतील सुसूत्रता यामुळे शिवकाळात कारभाराची घडी नीट बसून शेती व व्यापाराला चालना मिळाली. व्यापारी पेठा, बंदरे, आरमार यांचा विकास झाला.

समुद्र उल्लंघनाचे धाडस
मध्ययुगात सतीप्रथेला धार्मिक परंपरा मानले जात होते. ती अमानुष प्रथा होती. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर सती न जाता जिजाऊमाँसाहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. सतीप्रथा जिजाऊमाँसाहेबांनी नाकारली. यासाठी निश्‍चितच शिवाजी महाराजांचे बुद्धिप्रामाण्यवादी, मानवतावादी विचार महत्त्वाचे ठरतात. शिवाजी महाराज ग्रंथप्रामाण्यवादी नव्हते, तर बुद्धिप्रामाण्यवादी होते. मध्ययुगीन कालखंडात, अगदी आधुनिक काळाच्या उंबरठ्यावरही समुद्र ओलांडून जाणे अधर्म मानले जात होते. समुद्र ओलांडणाऱ्या अनेक विद्वानांना प्रायश्‍चित्त घ्यावे लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवाजी महाराज अधिक क्रांतिकारक ठरतात. कारण, त्यांनी आरमार दलाची उभारणी केली. स्वराज्याला सर्वाधिक धोका समुद्रमार्गे आहे. ज्याची समुद्रावर सत्ता, त्याची भूमीवर सत्ता; म्हणून त्यांनी सागरी किल्ले उभारले. समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधला. त्यांनी दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावरील बेदनूर राज्यातील बसरूरवर समुद्रमार्गे स्वारी केली. आठ फेब्रुवारी १६६५ रोजी ते आपल्या सैन्यासह जहाजे, गलबतांवरून मालवण येथून निघाले आणि १३ फेब्रुवारी १६६५ रोजी बसरूर बंदरात पोहोचले. सहा दिवस समुद्रातून त्यांनी प्रवास केला; म्हणजे समुद्र ओलांडून त्यांनी ‘सिंधुबंदी’ तोडली. मध्ययुगीन काळातील ही धाडसी आणि क्रांतिकारक घटना होती. शिवाजी महाराज बुद्धिप्रामाण्यवादी होते म्हणूनच समुद्र उल्लंघनाचे धाडस ते करू शकले.

शौर्यावर, कष्टावर विश्‍वास
महाराजांची तुळजाभवानीवर गाढ श्रद्धा होती. परंतु, भवानीदेवीने शिवाजी महाराजांना तलवार दिल्याचा संदर्भ नाही, तर ती तलवार शिवरायांना कोकणातील गोवले गावच्या सावंतांनी भेट दिली. तिचे नाव ‘भवानी’ असे ठेवण्यात आले. महाराजांचा विश्‍वास कर्तृत्वावर होता. त्यांच्या मावळ्यांनी सर्वस्व पणाला लावून स्वराज्य निर्माण केले. त्यांचा विश्‍वास मेंदू, मन, मनगटावर अर्थात शौर्यावर, चातुर्यावर, कष्टावर होता. त्यांनी कधी भविष्य, पंचांग, मुहूर्त पाहिले नाही. कोणत्याही व्यक्तीला अस्पृश्‍य समजले नाही. अनेक किल्ले बांधले. परंतु, वास्तुशास्त्र यासारख्या बाबींचे अवडंबर माजविले नाही.

२४ फेब्रुवारी १६७० रोजी शिवाजी महाराजांना सोयराबाईंच्या पोटी राजारामाचा जन्म झाला. तो पालथा जन्माला आला. मुलगा पालथा जन्मला म्हणजे अपशकुन झाला, अशी धारणा त्या काळी होती. त्या वेळेस शिवाजी महाराज म्हणाले, ‘‘हा दिल्लीची पातशाही पालथी घालील,’’ असे समकालीन कृष्णाजी अनंत सभासदाने नोंदवून ठेवले आहे. राजाराम महाराज पालथे जन्मले, या घटनेला अपशकुन न मानता ही घटना म्हणजे तो दिल्लीची पातशाही पालथी घालेल, असा सकारात्मक दृष्टिकोन महाराजांनी ठेवला. त्यांचा शुभ-अशुभ अशा गोष्टींवर विश्‍वास नव्हता. ते सर्जनशील, सकारात्मक, प्रयत्नवादी होते. महिलांचा आदर-सन्मान करणे, त्यांना घोड्यावर बसण्याचे, रणांगण गाजविण्याचे स्वातंत्र्य देणे, हे महाराजांच्या प्रगतिशील विचारांचे उदाहरण आहे. त्र्यंबक शंकर शेजवलकर म्हणतात, ‘‘शिवाजी महाराज पुराणमतवादी नसून, प्रागतिक सुधारणावादी होते. ते श्रद्धाळू होते हे निर्विवाद; पण ते शहाणे आणि विवेकी होते, हे त्याहून सत्य आहे.’’

ते सुधारणावादी होते म्हणूनच, भेदभाव न बाळगता ते सर्व जातिधर्मीयांना सोबत घेऊ शकले. महिलांना स्वातंत्र्य देऊ शकले आणि कर्मठ, अंधश्रद्धाळू, अनिष्ट परंपरा नाकारू शकले. हे लक्षात घेऊन शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी पिढी निर्माण व्हावी. संकटसमयी शिवाजी महाराज कधीच नाउमेद झाले नाहीत. मानवता, विवेक, समता, महिलांचा सन्मान, विकासाभिमुख शासनव्यवस्था या गोष्टी शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आजच्या काळासाठीही प्रेरणा देणाऱ्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, करारीपणा, पराक्रम, सहिष्णूता, लोकहिताची तळमळ यामुळे एक सर्वोत्तम राज्यव्यवस्था स्वराज्याच्या रूपाने निर्माण झाली. त्यांचे जीवनकार्य आजही जगभरातील प्रशासकांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!