राज्यविशेष बातमी

शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसूत्री आजही प्रासंगिक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे मान्यवरांचे महामानवास अभिवादन

मुंबई (BS24NEWS) – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासह मान्यवरांनी चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, पूज्य भदन्त डॉ.राहूल बोधी महाथेरो, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक हर्षोल्लासात साजरा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता यांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले असे सांगून त्यांनी दिलेली शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्रिसूत्री आजही प्रासंगिक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी बोलताना केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण समाजाला संविधानाच्या माध्यमातून समतेच्या सूत्रात गोवण्याचे काम केल्याचे राज्यपालांनी सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाच्या कामासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अनमोल आहे. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांचे विचार लागू पडतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जतन करून नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी शासनदेखील प्रयत्नशील आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजच्या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी स्वत: याबद्दल आपल्याकडे खंत व्यक्त केली. श्री.मुंडे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या बळकटीकरणासाठी 12 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजनेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. भिक्खू संघास मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चिवरदानाचे वितरण करण्यात आले. तसेच संगीत कला अकादमीतर्फे भीमगीतांचे सादरीकरण करण्यात आले. चैत्यभूमी स्मारक येथे शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, आमदार सर्वश्री नाना पटोले, भाई जगताप, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.

मुंबई महापालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, मान्यवरांनी या प्रदर्शन दालनास भेट दिली. या प्रदर्शनात मराठी व इंग्रजी कॉफी टेबल बुक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच बार्टीतर्फे विविध योजनांच्या माहितीचा स्टॉलदेखील लावण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे निवेदन चारूशीला शिनई यांनी तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन नागसेन कांबळे, चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे, अध्यक्ष सुनील बनसोडे यांनी पाहिले. आभार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!